
प्रतिनिधी |जालना
जालना तालुक्यातील निरखेडा येथे घरकुल योजनेअंतर्गत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्ञानेश्वर हरिश्चंद्र राठोड यांनी जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२४–२५ मध्ये निरखेडा येथील ग्रामस्थांसाठी १८० घरकुलांची यादी जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० लाभार्थ्यांनीच घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले असून उर्वरित १७० घरकुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. असे असतानाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोटी कागदपत्रे सादर करून, प्रत्येक लाभार्थ्याकडून सुमारे १५ हजार रुपये घेऊन १७० घरकुलांची देयके वितरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याउलट, ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांना बिले व देयके देताना संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे काम न झालेल्या घरकुलांना चुकीच्या पद्धतीने देयके देण्यात आली असून हा प्रकार गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी ज्ञानेश्वर राठोड यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.






