
प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
भारतीय कृषक समाजाच्या वतीने महान कृषी सुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे जयंती व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोतीगव्हाण (ता. जि. जालना) येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटील कदम यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कदम यांनी शेती क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आधुनिक पद्धतीचा अवलंब केला आहे. सुधारित जातीच्या बियाण्यांचा वापर, योग्य अंतर व योग्य रोपसंख्या राखून सरी–वरंबा पद्धतीने लागवड, टोकन यंत्रांचा प्रभावी वापर तसेच जैविक, नैसर्गिक व सेंद्रिय खतांचा अवलंब करून त्यांनी जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवले आहे. त्यांच्या या प्रयोगशील शेतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होत आहे.

याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत जिल्हा व राज्य पातळीवर उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल भारतीय कृषक समाज, नवी दिल्ली यांच्या वतीने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून दत्तात्रय पाटील कदम यांचे अभिनंदन होत आहे.






