प्रतिनिधी |जालना
हाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच नर्सिंग महाविद्यालयातील परीक्षांचा निकाल घोषित केला. जालना शहरातील समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयानेही अत्यंत चांगले यश मिळवून संस्थेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम1 ठेवली. नर्सिंगच्या प्रथम वर्षातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते व माजी सभापती देवनाथ जाधव, माजी नगरसेवक बाला परदेशी, प्राचार्य विकास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, शिवहरी मांटे, गणेश लाहोटी यांचीही उपस्थिती होती.
प्रथम वर्षाच्या या परीक्षेत साक्षी लिपने हिने ८९.२० टक्के घेऊन प्रथम, शाफिया शेख हिने ८७.६० टक्के गुण घेऊन द्वितीय तर अभिषेक रणमळे याने ८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील ९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, २१ प्रथम श्रेणी तर ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले की, संस्थेची यशाची परंपरा नर्सिंग महाविद्यालानेही कायम ठेवली राखली आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. संस्थेने नेहमीच दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य दिले, दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आपणांस उपलब्ध करून दिलेल्या चांगल्या संधीचा लाभ घेऊन आपण उत्तम ज्ञानप्राप्ती करावी. पाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासारखा पालकांना दुसरा आनंद नसतो. आई वडील हे आपल्याकडे अत्यंत आशेने पहात असतात. त्यांचीही आपल्याकडून काही स्वप्न असतात त्यांना तडा जाता कामा नये. असे सांगून अंबेकर पुढे म्हणाले की, नर्सिंग क्षेत्रात अत्यंत चांगल्या संधी आहेत. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अत्यंत चांगला अभ्यास करून यशस्वी होणे गरजेचे आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विदेशातही काम करण्याची मोठी संधी आहे. कोविडच्या काळात देशात परिचारिकांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन हजारो नागरिकांचे प्राण वाचविले. त्यामुळे आपला हा व्यवसाय अत्यंत महत्वाचा व नागरिकांच्या जीवन-मरणाशी संबंधित असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.
सर्व शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना घडविले असल्याने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. तसेच नवीन विद्यार्थ्यांनीही जुन्या विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेऊन कठोर अभ्यास करावा असे आवाहन केले. यावेळी शिक्षक श्रीमती विद्या भालेराव, श्रीमती लक्ष्मी वटाणे, श्रीमती पूनम गायकवाड, लिपिक विशाल वाघ, तुकाराम चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.







