
प्रतिनिधी | जालना
जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मागणी व पुरवठ्यात ताण निर्माण होऊ नये आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राहावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशानुसार, दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार आहे. तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांपर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कॅन, बाटल्या किंवा इतर भांड्यांमध्ये इंधन देण्यास बंदी.
नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी व आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे
रुग्णवाहिका (Ambulance) व अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा
प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज उपलब्ध साठा व विक्रीची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक
सर्व पेट्रोल पंप चालकांनी आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक
कडक कारवाईचा इशारा
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.






