
प्रतिनिधी |जालना
जालना जिल्ह्यातील अंबड मध्ये पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात नोकरीवर असलेले आनंद बळीराम शिंदे हे खास मतदान करण्यासाठी गावात आले होते. मात्र मतदान केंद्रात गेल्यानंतर त्यांना तुमचे मतदान आधीच झाले आहे. असे सांगण्यात आले. यामुळे ते थक्क झाले. त्यांच्या हातावर मतदानाची शाई नव्हती आणि त्यांनी स्वतः मतदान केलेले नसतानाही त्यांच्या नावावर मत नोंदवले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिंदे यांनी सांगितले की, मी पुण्याहून एवढा प्रवास करून केवळ मतदानाच्या हक्कासाठी आलो. मात्र माझ्या नावावर बोगस मतदान झाल्याचे समजताच धक्का बसला. हा सरळसरळ आमच्या लोकशाही हक्कावर घाला आहे. त्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कठोर चौकशीची मागणी केली आहे.या घटनेमुळे स्थानिकांमध्येही असंतोषाची भावना व्यक्त होत आहे. अशा प्रकारे खोटे मतदान होणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा घटनांमुळे निवडणुकीची पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास धोक्यात येत असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.






